स्वाधार योजनेच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठीची योजना कार्यान्वित करा – जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे

 

संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

अंबाजोगाई :प्रतिनिधी
ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास व भोजनासाठी एक रकमी रक्कम देण्यासंदर्भातील योजना तात्काळ कार्यान्वित करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शुक्रवार,दि. 14 जुलै रोजी उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नागपुर येथे झालेल्या मागील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास व भोजनासाठी एकरकमी रक्कम देण्यासंदर्भातील योजना जाहिर केली होती. मात्र अजुनही त्याचा शासन निर्णय आला नाही. ओबीसी समाजाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्वाची आहे. सत्र 2023-24 ला जून महिन्यापासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे हा शासन निर्णय लवकर निघाल्यास गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना या सत्रापासून मिळणारा लाभ घेता येईल व आपण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाप्रती संवेदनशील आहात हे देखील यातून सिद्ध होईल. अन्यथा ओबीसी विद्यार्थी आशेवरच वाट पाहात राहतील. त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. तरी आपल्या सरकारने दिलेला शब्द पाळावा व तमाम ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी निवेदनात नमुद केले आहे. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव नारायणराव मुळे, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्‍वर मिसाळ, शहराध्यक्ष सिद्राम यादव, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीष कुंडगर, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष केशव टेहरे, रोहन कुलकर्णी, दत्तात्रय गंगणे, आर.जी.मस्के, नितीन राठोड आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Related Articles

Latest Articles